सक्षम भारत वार्ता
नागपूर, ता.३१ : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्रद्धा फाउंडेशन तर्फे जूनी शुक्रवारी, नागपूर येथे प्रेरणादायी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदर, संस्कार आणि शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या पूजनाने व सरस्वती वंदनेने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरुंचे जीवनातील स्थान तसेच त्यांच्याप्रती आदर, श्रद्धा आणि कर्तव्यभाव याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. श्रद्धा फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “गुरु हे जीवनाला योग्य दिशा देणारे खरे मार्गदर्शक असतात. त्यांच्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच व्यक्तिमत्त्व घडते आणि यशस्वी आयुष्याची पायाभरणी होते.” कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेसह विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या संयोजिका भावना जैन तसेच संयोजक ऋषभ जैन आणि ईशांत जैन यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि गुरुजनांप्रती आदरभाव कायम ठेवण्याचा संदेश दिला. यावेळी फाउंडेशनचे कार्यकर्ते हर्षद जमोदकर व नंदन जैस उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी केली.











